पुणे : स्वबळावर स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव गोयल गंगा फाउंडेशनच्यावतीने करण्यात आला. गंगा ग्लिटझ येथे आयोजित करण्यात आलेल्या रास दांडिया सोहळ्यात गीता गोयल यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, तुळशीचे रोप देऊन या महिलांना सन्मानित करण्यात आले.
सातारा येथील बॉक्सींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या कोमल बेलखेडे या तरुणीने खडतर परिस्थितीवर मात करत बॉक्सिंगमध्ये प्राविण्य मिळवत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
पर्यावरणप्रेमी व दिव्यांगासाठी काम करणाऱ्या सुषमा भालेराव या चित्रकार आहेत. विविध सामाजिक उपक्रमात त्या हिरीरीने सहभाग घेतात. अक्षरस्पर्श संस्थेच्या माध्यमातून समाज कार्य करणाऱ्या दिपाली निखील या स्वतःच्या खर्चातून दिव्यांग मुलांचा सांभाळ करतात. आशा मोरे व सविता भोसले या महिलांना दुचाकी व चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देतात. डी. वाय. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ने-आण करण्याचे काम आत्मियतेने करतात.
गोयल गंगा फाउंडेशनच्या विश्वस्त गीता गोयल म्हणाल्या, या स्त्रियांनी स्वतःच्या कार्यातून ओळख निर्माण केली आहे. समाजातील प्रत्येक स्तरात कर्तृत्ववान स्त्रिया कार्यरत असताना दिसतात. कोणतीही आशा, अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या, प्रसिध्दीपासून दूर असलेल्या गुणवंत स्त्रियांचा सन्मान व्हायला हवा यासाठीच आम्ही गोयल गंगा फाउंडेशनच्यावतीने त्यांना सन्मानित करत आहोत. समाजात सकारात्मक भावना वाढीस लागावी हा या पुरस्कारामागचा हेतू आहे.
या वेळी सलोनी गोयल, अतुल गोयल, जयप्रकाश गोयल आणि बॉईज चित्रपटातील कलाकार दिग्विजय जोशी उपस्थित होते. रास दांडिया स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित महिलांनी जागेगी नारी, तो जागेगा इंडिया असा जयघोष करत सन्मानित करण्यात आलेल्या महिलांच्या कर्तृत्वाला टाळ्यांच्या गजरात दाद दिली. दिग्विजय जोशी यांनी सूत्रसंचालन केले.